महापराक्रमी संताजी घोरपडे

 संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे ह्या महाराष्ट्रभूमीला लाभलेली अशीच अलौकिक नर-रत्ने. छत्रपती शिवाजी महाराजांनी अगणित अश्या असंख्य महावीर-महाशूर अश्या नर-रत्नांचा अलौकिक खजिनाच ह्या महाराष्ट्र भूमीतुन शोधून काढला.

महापराक्रमी संताजी घोरपडे

छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या करून दुर्योधनरूपी औरंग्या ह्या महाराष्ट्र मातेच्या आब्रूला हात लावण्यास धावणार तोच ह्या औरंग्याचा चौरंग करण्यासाठी ह्या महाराष्ट्र मातेचे कृष्णासमान असंख्य शूरवीर आपल्या तलवारी नाचवित औरंग्यावर धावून आले.आपल्या महा-पराक्रमाने त्यांनी हा औरंगजेब अडविला. नुसता अडविला नाही तर ठायी-ठायी त्याचा केवळ आणि केवळ दारुण पराभव केला. देशात काय, खानदेशात काय,

कोकणात काय, आणी वऱ्हाडात काय सगळीकडे औरंगजेबाचा केवळ पराभव आणि पराभवच होत होता.
५ एप्रिल १६९३.=जासूदांच्या तोंडून औरंगजेबाला बातमी आली कि,"उत्तरेकडून औरंगजेब बादशहाच्या मदतीसाठी मोठा काफिला येत होता. तो काफिला कामठीला पोहचला आणि मराठ्यांनी ह्या काफिल्यावर तुफान असा हल्ला चढविला.औरंगजेब बादशहाच्या मदतीसाठी आलेला संपूर्ण काफिला मराठ्यांनी लुटला आणि सगळी मालमत्ता घेऊन मराठे निघून गेले.."अश्या रोजच्याच येणाऱ्या बातम्यांनी औरंगजेबाचे कान अक्षरशः विटले होते. ह्या बातम्या ऐकण्यापेक्षा आपण बहिरेच जन्माला आलो असतो तर फार बरे झाले असते असे औरंगजेबाला महाराष्ट्रात आल्यापासून सारखे वाटत असे.पण क्वचित प्रसंगी औरंगजेबाला आनंदाची बातमी सुद्धा ऐकायला मिळत असे.
९ सप्टेंबर १६९५= रोजी चंदन वंदन जवळ औरंगजेबाचा सरदार हमीदुद्दीनखान याने संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांचा पराभव केला. ह्या लढाईत धनाजी जाधवांचा मुलगा मारला गेला.
लढाई करून तिकडून हमीदुद्दीनखान तसाच आपल्या फौजेसहित औरंगजेबाच्या छावणीत हजर झाला तेंव्हा औरंगजेब बादशाह खुश होऊन म्हणाला, "आफरीन बाद, आफरीन बाद , गनीमरा खूब तंबी नमुदा."
म्हणजे 'धन्य धन्य तुझी गनिमांना चांगले खडे चारलेस.'औरंगजेब बादशहाने खुश होऊन हमीदुद्दीनखानाला तलवार भेट केली.पण असे भाग्य औरंगजेबाला फारच क्वचितच मिळे. तसेही विव्हळत विव्हळत हाय-हाय.. औरंगजेब तर रोजच म्हणत असे.हमीदुद्दीनखानसारखे यशस्वी लोक औरंगजेबाजवळ फारच थोडे होते. बाकी जिथे तिथे मुघलांची हमखास फजिती आणि पराभव होत असत आणि औरंगजेबाला ह्यामुळे अत्यंत कष्ट
होत असे.औरंगजेबाच्या मनोधैर्याला आणि मनः स्वास्थाला सर्वात जबरदस्त सुरुंग लावला तो संताजी घोरपडे यांनी.
मदोन्मत्त हत्तीच्या शुंडा-दंडाच्या आघाताने मोठं मोठे महावृक्ष उन्मळून पडावेत तसे मी मी म्हणणारे मुघलांचे एकाहून एक शूर धुरंधर सेनानायक संताजीच्या तडाख्यापुढे वेगाने भुईसपाट होत होते.संताजीने ऑगस्ट महिन्याच्या धो धो पडणाऱ्या पावसात औरंगजेबाच्या कोरेगावच्या छावणीवर रात्री छापा घालून खुद्द औरंगजेबाच्या तंबुचेच सोन्याचे कळस कापून जेंव्हा आणले होते तेंव्हाच औरंगजेबाला हा संताजी काय भयंकर शूरवीर आहे ह्याचा साक्षात्कार झालेला होता.

साताऱ्याच्या उघड्या मैदानात संताजीने सर्जाखानाला जिंकले होते.


कर्नाटकाच्या सरहद्दीवरील बिदनूरच्या राणीचे राज्य धुळीला मिळविण्याची औरंगजेबाची महत्वकांक्षा पूर्ण करण्यास गेलेल्या जाननिसारखान आणि तुहब्बर खान यांचा दारुण पराभव करून संताजीने औरंगजेबाच्या महत्वकांक्षेलाच मूठमाती दिली होती.संताजीने मायणी खटावला असलेल्या लुफतुल्लाखानाला मुसळधार कोसळणाऱ्या पावसात गाठून बंदुकीच्या गोळ्यांच्या तुफान वर्षावाचा मारा करत नेस्तनाबूत केले होते.
तसेच जिंजीला जाऊन झुल्फीकारखानालाही झोडपून काढले होते.
संताजीने अलीमर्दनखानाला कैद करून बदल्यात सुटकेसाठी खंडणीचे एक लाख होन गोळा करण्यासाठी त्याच्या माणसांना भीक मागत फिरायला लावले होते.
२५ एप्रिल १६९३ चे अलीमर्दनखानाच्या लोकांनी औरंगजेब बादशहाला दिलेले एक आर्जव पत्र उपलब्ध आहे. त्या आर्जव पत्रात म्हटलंय कि, " अलीमर्दनखानास मराठ्यांनी पकडून कैदेत टाकले आहे. एक लाख होन खंडणी भरल्याशिवाय मराठे अलीमर्दनखानास सोडायला तयार नाहीत. अलीमर्दनखानाची माणसे हैदराबादेत आलेली आहेत.अलीमर्दनखानाचे हत्ती आणि इतर जिन्नस विकून खंडणीची भरपाई करण्याचा प्रयत्न त्याचे लोक करीत आहेत. परंतु हैदराबादचे अधिकारी वरील जिन्नस विकण्यास मनाई करत
आहेत."ह्यावर औरंगजेब बादशहाने हैदराबादचा सुभेदार जानसिपार खान ह्यास लिहून कळविले कि, "अलीमर्दनखानाच्या लोकांस हत्ती आणि इतर जिन्नस विकण्यास आडकाठी करू नये." > Anil Patil: अक्षरशः भीक मागून आणि जवळ आहे ते सर्व विकून शेवटी अलीमर्दनखानाच्या लोकांनी पैसे गोळा केले आणि संताजी घोरपड्यांस आणून दिले.मगच संताजीने अलीमर्दनखानाची सुटका केली.पैसे गोळा केले नाही तर अलीमर्दनखान त्या संताजीच्या हातून जिवंत परत येणार नाही याची जाणीव खुद्द औरंगजेबासही झाली होती हे ह्या वरील पत्रावरून दिसून येईल.
मोगलांच्या गजबजलेल्या छावण्या संताजीच्या घोडदळाच्या तडाख्यात सापडल्या कि 'वावटळीत सगळे काही उडून जावे आणि मागे काहीही शिल्लकच राहू नये.. ' असे हाल मुघलांच्या छावण्यांचे होत असत.

औरंगजेब तर संताजीला घाबरून जाऊन 'सैतानच' म्हणत असे.

"हा संताजी कसा काबूत करावा? " ह्याचा उपाय शोधण्यासाठी औरंगजेब दिवसरात्र विचार करत असे.ह्या विचारात औरंगजेबाने किती वर्ष खर्च केली माहितीये? ...तब्बल बारा वर्ष.औरंगजेबाने 'संताजी कसा काबूत करावा' हे शोधण्यात बारा वर्ष वेळ घालविला.दिलेर खान, हसनअली खान, रणमस्त खान, बक्षी रुहुल्ला खान असे सारे सारे औरंगजेबाचे सेनापती मराठ्यांनी यमसदनास धाडले होते.शेवटी शोधून शोधून दमलेल्या औरंगजेबाने आपला दूध भाऊ खानजहान ह्याचा मुलगा हिंमतखान याची निवड संताजीवर केली.हा हिंमतखान ह्यावेळी अलाहाबादचा सुभेदार होता. त्याला ताबडतोब दक्षिणेत बोलाविले गेले. हिंमतखान कसलेला शिपाईगडी होता. संताजीच्या विरुद्ध आता हिंमतखान लढणार होता.औरंगजेबाचा दूधभाऊ खानजहान ह्याने ह्यावेळी औरंगजेबाला एक सल्ला दिला. तो औरंगजेबाला म्हणाला कि "आपण मराठ्यांशी समझोता करू." आश्चर्य म्हणजे औरंगजेबाला हा सल्ला पटलाही.औरंगजेबाने दूधभाऊ खानजहानला स्वतःच्या शिक्याची कौलपत्रे मराठ्यांस पाठवून भेटीस बोलावयास सांगितले.खानजहानचा मुलगा हिंमतखान हि कौलपत्रे घेऊन संताजी-धनाजीस भेटावयास गेला.

संताजी-धनाजी ह्यांनी औरंगजेबाच्या ह्या समझोत्याला केराची टोपली दाखविली आणि हिंमतखानास हाकलून दिले.हिंमतखान निराश होऊन परत माघारी आला.आता मुघलांना चांगलीच अद्दल घडवायची ह्या हेतूने मराठे युद्धास प्रवृत्त झाले आणि त्यांनी औरंगजेबाच्या मुलखात नुसता उच्छाद मांडायला सुरवात केली.इथून पुढे मजेदार आहे. सावध वाचावे.आता सामोपचाराने प्रश्न सुटत नाही म्हंटल्यावर युद्ध कारण्याशिवाय औरंगजेबासमोर पर्यायच उरला नाही.मग मात्र हिंमतखानाने चिडून जाऊन संताजीच्या विरुद्ध कमरेस तलवार बांधली.
आता हिंमतखान संताजीचा पाठलाग करू लागला. पण संताजी आज इथे तर उद्या तिथे असा बेफान वारू सारखा धावू लागला. संताजी हातासच लागेना तर लढाई कुठून करायची?दोन महिन्यांतच कर्नाटकातील विक्रमहळ्ळी, मांडवगाव, मळखेड, कालकुर्ती, हैद्राबाद या बाजूने जाऊन साताऱ्याच्या महादेव डोंगरापर्यंत संताजीने हिंमतखानास आपल्यामागे असे धावायला लावले कि त्याच्या घोड्याच्याच काय पण स्वतःच्याही तोंडाला फेस आला असेल.
मराठ्यांची घोडदौड हा काय प्रकार आहे आणि त्यांच्या मागे धावताना कमरेची हाडे कशी ढिल्ली होतात याचा अनुभव घेत घेतच ह्या हिंमतखानाचा बाप खानजहान हा म्हातारा झाला होता. आता तोच अनुभव त्याचा चिरंजीव हिंमतखान घेत होता.हिंमतखानाला गरा गरा फिरविण्याच्या नादात मुघलांच्या फौजा जितक्या पांगविता येतील तितक्या त्या दूर पांगवाव्यात असे संताजीचे धोरण होते. संताजी त्यांच्या ह्या व्युव्हरचनेत यशस्वी झाले.हा हिंमतखान प्रामाणिक मूर्ख होता. त्याने मांडवगड, मलखेड, कालकुर्ती विक्रमहळ्ळी इत्यादी ठिकाणी संताजीचा पाठलाग करत करत छोट्या मोठ्या लढाया केल्या.विक्रमहळ्ळीला तर त्याने संताजीची तीनशे माणसे ठार केली तसेच तीनशे घोडी आणि नगारे-निशाणे हस्तगत केली. ह्या लढाईत हिंमतखानाचीही बरीच माणसे मारली गेली.
औरंगजेबाने विक्रमहळ्ळीच्या लढाईच्या ह्या पराक्रमावर खुश होऊन हिंमतखानाचे 'खाल्ल्या मिठास जागला, शाब्बास तुझी' असे म्हणत कौतुक केले पाठलागावर पुढे जात ह्या हिंमतखानाने चितापूरजवळ असलेल्या अलूरच्या गढीत संताजीला कोंडले आणि गढीला वेढा दिला. इतकेच नव्हे तर हिंमतखानाने त्या
परिसरातील जमीनदारांकडून 'आम्ही संताजीस पळून जाण्यास मदत करणार नाही' असे मुचलके लिहून घेतले.पण तरीही संताजी वेढा फोडून निसटलाच.संताजीचा पाठलाग करत करत हिंमतखान ६ मार्च १६९४ रोजी थेट आंध्र प्रदेशातील कालकुर्ती भरम येथे पोहचला. ह्यावेळी पाठलागावरच्या लढाया सारख्या चालूच होत्या.
संताजीने ह्या हिंमतखानाला असेच महिनाभर आपल्यामागे फिरवत फिरवत आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजे साताऱ्याजवळील महादेवाच्या डोंगराच्या पायथ्याला आणले.संताजी महादेवाच्या डोंगरात शिरला. > Anil Patil: आता मात्र हिंमतखानाचा धीर सुटला. तिथून त्याने औरंगजेबाला पत्र पाठवून 'आजून कुमक पाठवून द्यावी म्हणजे मी संताजीस पकडतो' असे लिहिले.पण औरंगजेबाने कुमक न पाठविता उलटे हिंमतखानास सांगितले कि"मराठ्यांची वाट आडवा. डोंगरातून मराठे बाहेर पडले कि त्यांचा मोड करा."
औरंगजेबाच्या ह्या उत्तराने हिंमतखानासमोर काहीही पर्याय राहिला नाही.महादेवाच्या डोंगराच्या पायथ्याला बसून हिंमतखान संताजीला पकडण्यासाठी आपल्या कल्पनेचे घोडे दौडत होता. पण आता तर त्याचे कल्पनेचे घोडेही संताजीस गाठू शकत नव्हते.
नोहेंबर १६९५ मध्ये संताजी रात्रीच्या अंधारात महादेवाच्या डोंगरातून निघून थेट कर्नाटकातच उतरला आणि तिथून तो जिंजीकडे जाऊ लागला.हिंमतखानास जेव्हा हे कळले तेंव्हा त्याने संताजीचा परत पाठलाग सुरु केला. संताजी पुढे आणि हिंमतखान मागे हे चक्र परत सुरु झाले.

पाठलागाला कंटाळून दमून भागून हिंमतखान बसवापट्टणलाच थांबला. तो काही पुढे संताजीच्या पाठलागावर गेला नाही.संताजीच्या पूर्वीच धनाजी जाधव हेही मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या वेल्लूरला औरंगजेबाच्या झुल्फीकारखानाने घातलेला वेढा मोडून काढण्यासाठी पुढे गेलेले होते.आता मागून हा संताजी त्या धनाजीस जाऊन मिळणार ह्या बातमीने औरंगजेबाच्या पोटात धस्सच झाले. "मराठ्यांचे हे दोन वाघ मिळून आता झुल्फीकारखानाला कच्चा खाणारा.." ह्या कल्पनेने औरंगजेबाची शरीरातील सगळी ताकदच निघून गेली.हतवीर्य होऊन अवसान गिळत औरंगजेबाने "संताजीला काहीही करून जिंजीकडे जाऊ देऊ नका" म्हणून कर्नाटकाचा फौजदार कासिम खान ह्यास तातडीने लिहून पाठविले.
शिवाय ताबडतोब त्याने आपले दोन सरदार खानाजाद खान आणि सरदार सफशिकनखान ह्यांच्या दिमतीस पंचवीस हजार फौज आणि तोफखाना देऊन ताबडतोब कर्नाटकाचा फौजदारकासिम खान ह्याच्या मदतीस पाठवून दिले.औरंगजेबाचा कर्नाटकाचा फौजदार कासिमखान हा अधोणीच्या किल्यावर मुक्कामी येऊन थांबला. तिथं त्याला मागून आलेले औरंगजेबाचे सरदार खानाजाद खान आणि सफशिकनखान आपल्या पंचवीस हजार फौजेसहित येऊन मिळाले.आता तो अधोनीला संताजीची वाट पाहत बसला.
कासिमखान हा हि मूर्खच होता. आपल्या मदतीला आलेले औरंगजेबाचे दोन सरदार आणि पंचवीस हजार मुघल फौजेचा पाहुणचार आणि जंगी मेजवान्या करण्यासाठी कासिमखानानेअधोणीच्या किल्ल्यातून मेजवानीसाठी बाहेर काढलेले कोरे करकरीत कर्नाटकी तंबू, सोन्याचांदीची भांडी, मेवा मिठाई, भांडी, दारू, बायका आणि खजिना दिमतीस आलेल्या२५ हजार फौजेच्या पाहुणचारासाठी बाहेर काढला; आणि पेशखान्याबरोबर अधोणीच्या किल्ल्यापासून दोन कोस अंतरावर असलेल्या २५ हजार मुघल फौजेकडे पाठवून दिला.अत्यंत गुप्तपणे संताजी ह्या कासिमखानापासून बरोबर सहा कोसांवर येऊन उभा राहिला.संताजी कासिमखानावावर पाळत ठेऊनच होता.पेशखाना रवाना झाल्याची खबर मिळताच संताजीने आपल्या फौजच्या तीन तुकड्या केल्या. पहिली तुकडी पेशखाना लुटण्यासाठी, दुसरी तुकडी चालून येणाऱ्या मुघलांचा समाचार घेण्यासाठी आणि तिसरी तुकडी राखीव दिमतीस.पहाटेच्या अंधारात अधोनीच्या किल्ल्यातून पेशखाना वाट चालत जसा निघाला आणि एक कोसावर येऊन ठेपला तसा मराठ्यांच्या पहिल्या तुकडीने त्यावर जोरदार हल्ला चढविला.
जशी लढाईची धामधूम वाढायला लागली तशी पेशखान्याची सगळी मालमत्ता जागेवर सोडून मुघली फौज आपला जीव वाचवून पळू लागली.पेशखान्याच्या मदतीला फौजदार कासिमखान किल्ल्यातून धावून आला आणि त्याच्या बरोबर मराठ्यांच्या पहिल्या तुकडीची जोरदार लढाई सुरु झाली.कासिमखानाला लढाईत अडकवून ठेऊन मराठ्यांच्या पहिल्या तुकडीने पेशखाना लुटून साफसूफ केला. बायका सोडून. (पर स्त्रीला हात लावायचा नाही असा दंडकच होता मराठ्यांचा.)हि लढाई इकडे पहाटेच्या अंधारात सुरु झालेली असतानाच तिकडे पहाटेच्या साखर झोपेत असलेल्या औरंगजेबाची खानजादखान, सफशिकन खान हि पाहुणे मंडळी उद्या आपल्याला मिळणाऱ्या पाहुणचाराची गोड स्वप्ने रंगवीत होती.मागे चाललेल्या ह्या लढाईची हि बातमी पुढे साखर झोपेत असलेल्या २५ हजार मुघली फौजेला कळाली आणि कानामागे अचानक बंदुकीचा बार वाजावा अशी कानठळीच त्यांना बसली.
डोळे चोळीत जो तो पडत-धडपडत तलवार शोधत, भाले शोधत, बंदुका शोधत लढाईच्या तयारीला लागला.संताजी ह्याचीच वाट पहात होता.
मराठ्यांच्या पहिल्या तुकडीने मुघलांचा पेशखाना लुटून नेला आणि मराठ्यांच्या दुसऱ्या तुकडीने आता कासिमखानाला आपल्याकडे ओढत त्याच्याशी लढायला सुरवात केली. लढत लढत मराठ्यांचीदुसरी २५ हजार मुघलांच्या फौजेच्या छावणीवर चालून गेली.साखरझोपेत असेल्या मुघली फौजेवर असा काही मराठ्यांचा तडाखा पडला कि त्यात त्यांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. मराठ्यांनी मुघल छावणीतील सगळी मालमत्ता,
हत्यारे, सोने नाणे लुटून धुमाकूळ घालत छावणीला आग लावून दिली.मराठ्यांच्या दुसऱ्या तुकडीच्या धुमश्चक्रीत कासीमखान आणी खानजादखान हे जीव खाऊन मराठ्यांशी लढत होते.
पहाटेच्या अंधारात हि घनघोर लढाई सुरु झाली होती. जस जसा दिवस उजाडत गेला तस तसे मराठ्यांनी दातओठ खात मुघलांना बेक्कार ठोकून काढले. मुघलांकडील अनेक ठार झाले, तसेच जखमीही खुप झाले.
दुपारच्या उन्हात मराठ्यांच्या दुसऱ्या तुकडीने आता माघार घेतली आणि ताज्या दमाची मराठ्यांची तिसरीतुकडी आता मैदानात आली. लढाई ऐन निकाराला आलेली असताना आपली छावणी गारद झाली, तिला मराठ्यांनी लुटून पेटवून दिले ही बातमी लढाई करणाऱ्या कासीमखान आणी खानजादखान यांना समजली.संताजीने मुद्दामच ही बातमी त्यांना कशी लवकर पोहचेल ह्याची व्यवस्था केलेली होती.
कासीमखान आणी खानजादखान ह्या बातमीने गोंधळले आणी घाई घाईने त्यांनी जवळच आपल्याच ताब्यात असलेल्या दोड्डेरीच्या किल्याकडे आसऱ्यासाठी धाव घेतली.ह्यावेळी आता संध्याकाळ होऊन अंधार पडायला लागला होता.

ह्या दोड्डेरीच्या किल्यापुढे एक मोठा तलाव होता. तलाव आणी किल्ला ह्यांत साधारण एक कोसांचे अंतर होते. तिथे जाऊन पोहचेपर्यंत मुघलांना मराठ्यांशी लढत लढतच जावे लागले. हा किल्ला मुघलांकडेच होता.
पण भयास्तव मुघलांची किल्ल्यातील फौज ह्या कासीमखान आणी खानजादखान यांच्या फौजेला किल्ल्यात येऊ देईना. त्यांनी किल्याचे दरवाजे आतून लावून घेतले.शेवटी निरुपायाने दमलेल्या मुघलांच्या फौजेने किल्यासमोरील तलावाच्या काठी आपला तळ दिला.मुघलांनी जसा तळ दिला तसे मराठ्यांनी मुघलांना चहुंबाजूनी घेरले.आता मराठ्यांची पहिली आणि दुसरी तुकडी ताजीतवानी होऊन तिसऱ्या तुकडीच्या मदतीसाठी परत मैदानात आली होती.कासीमखान आणी खानजादखान यांच्याजवळ जे काही खाण्याचे सामान होते ते खाऊन त्यांनी आपली राहिलेली मेजवानी रडत कढत साजरी केली.
दिवस संपून आता रात्र पडली होती. दिवसभराच्या लढाईच्या दगदगीने मुगलांचे सैन्य पार दमून गेले होते.त्यामुळे सहाजीकच दमलेल्या मुघलांचे डोळे अनावर झोपेमुळे आता मिटू लागले.पण मराठे काही मुघलांना झोपू देईनात. मुघल डुलक्या मारायला लागले कि मराठे गुपचूप येऊन त्यांच्यावर हल्ले चढवत.
रात्रीच्या अंधारातच वैतागून परत मुघलांनी तलवारी हातात घेतल्या आणी मराठयांच्या पुढे लढायला उभे ठाकले.पण मराठे लढेनातही. मराठे फक्त मुघलांच्या समोर येऊन परत मागे जात. जेवण नाही, झोप नाही, शिवाय पहाटेपासून सुरु झालेली लढाई घनघोर रात्र झाली तरी संपायचे नाव घेईना.
मराठ्यांनी एक दोन नव्हे तर चक्क तीन दिवस आणी तीन रात्र मुघलांना घोड्यावर असेच बसवून ठेवले तिसरा दिवस जाऊन आता चौथा दिवस उजाडला आणी मुघलांच्या अशा पल्लवित झाल्या.

मागून दहा हजार फौज आपल्या मदतीस येत आहे असे मुघलांना कळाले. फौज मदतीला येत आहे हे पाहून मुघलांना मोठा हुरूप आला. आनंदाने ते नाचूच लागले.पण ती फौज आपल्या नव्हे तर संताजीच्या मदतीस येत आहे हे जेंव्हा त्यांना कळाले तेंव्हा तर मुघलांनी आरडाओरडा करत छाती बडवत रडायलाच सुरवात केली.ती दहा हजार फौज होती चित्रदूर्गच्या ब्रम्हप्पा नायकाची.मुघलांचा कर्नाटकचा फौजदार असलेल्या ह्या कासिमखानाने पूर्वी ह्या ब्रम्हप्पा नायकाला अतिशय छळले होते. त्याचाच बदला म्हणून हा ब्रम्हप्पा नायक आपली १० हजार
फौज घेऊन मराठ्यांच्या मदतीला आला होता.
ब्रम्हप्पा नायकाने मात्र मराठ्यांच्या मदतीने कासिमखानावर चांगलाच सूड उगविला.चौथ्या दिवशी जेंव्हा युद्धाला सुरवात झाली तेंव्हा मुघलांकडे दारूगोळाही शिल्लक राहिला नव्हता. लढाई न करताच भुकेने मुघल जमिनीवर कोसळत होते. मुगलांवर संताजीच्या फौजेकडून बंदुकीच्या गोळ्यांचा बेफान पाऊस पडत होता. मुघल सैन्य आक्रोश करीत सैरा-भैरा इकडे तिकडे जीव वाचवून पळत होते.
शेवटी कासीमखान आणी खानजादखान जीव वाचून काही सैन्यानिशी प्रयत्नाने दोड्डेरीच्या किल्यात शिरलेच.
पण तिथं तर फक्त एक दिवसाचेच धान्य शिल्लक होते. मग त्या दिवशी किल्यात सगळ्यांनी मिळून ज्वारी -बाजरीच्या भाकरी खाऊन दिवस ढकलला.बाहेरून मराठ्यांनी आपला वेढा आता अधिक घट्ट आवळला.
उपासमारीने म्हणा किंवा अफूच्या अति सेवनाने म्हणा. पण बहुतेक मराठ्यांच्या भीतीने दोड्डेरीच्या किल्यात शिरल्यापासून तिसऱ्या दिवशी कासीमखान मृत्युमुखी पडला.कासीमखान मेल्याने मुघलांचा धीरच खचला. भुकेमुळे मुघल सैनिक किल्ल्यातील छपरांवरचे गवत खाऊ लागले. शेवटी मराठ्यांनी किल्याच्या बुरूजालाच सुरुंग लावला. बुरुज धडाधड कोसला आणी मग किल्ल्यातील खानजादखानाने संताजीपाशी तहाची याचना केली.
तहात ठरल्या प्रमाणे कासीमखानाची सर्व सम्पत्ती, हत्ती-घोडे, नगदी पैसे आणी सोने नाणे संताजीच्या हवाली करण्यात आले. शिवाय तीस लाख रुपये युद्धखर्च म्हणून संताजीने खानजादखानाकडून मान्य करून घेतले. ह्यासाठी संताजीने कासीमखानाचा विश्वासू कारभारी बालकिशन याचा मुलगा आपल्याकडे ओलीस ठेऊन घेतला.दोड्डेरीची लढाई सुरु झाल्यापासून तेराव्या दिवशी संपली. तेराव्या दिवशी मोगल किल्ल्यातून बाहेर पडले. संताजीने सर्व उपाशी मुघल सैनिकांना भाकरी आणी पाणी दिले.

संताजीने मुघलांना अभय दिले. 

किल्ल्याबाहेर दोन दिवस मुक्काम करून आणी विश्रांती घेऊन मुघलांचे उरलेले सैन्य खानजादखानासह औरंगाबादकडे चालते झाले. वाटेत ह्या मुघलांवर परत मराठ्यांनी कोणी  हल्ला करू नये म्हणून संताजीने एक फौजेची तुकडी त्यांच्या बरोबर रवाना केली.औरंगजेबाला आपल्या २५ हजार फौजेचा झालेला सर्वनाश पाहवला नाही. अत्यंत दुखी कष्टी होत त्याने या खुदा- या खुदा ओरडत आणी संताजीला शिव्या देत छाती बडवत

अन्न पाण्या विना बिछानाच पकडला.

औरंगाबादला आल्यावर खानजादखानाला औरंगजेबाने आपल्यासमोर येऊच दिले नाही.औरंगजेबाला ह्याचा फार भरवसा होता म्हणून ह्याला कासिमखानाच्या मदतीस पाठविला होता.रागाच्या भरात औरंगजेबाने ह्या खानजादखानाची भेट न घेताच बाहेरच्या बाहेर दूर बिदरच्या सुभ्यावर त्याला हाकलून दिले.

आता आपण परत थोडे मागे येऊयात.
मागे बसवापट्टणला थांबलेला हिंमतखान हाच काय तो आता औरंगजेबासाठी तारणहार उरला होता.मुघलांच्या २५ हजार फौजेचा इतका दारुण पराभव केल्यावर संताजी परत मागे बसवापट्टणला आला.
संताजीचा मागचा हिशोब बाकी होता. संताजी जसा बसवापट्टणला आला तसा हिंमतखान घाबरून जाऊन बसवापट्टणच्या गढीत जाऊन लपून बसला. २० जानेवारी १६९६ रोजी बसवापट्टण येथे संताजीने ह्या हिंमतखानाला गचांडी पकडून गढीतून बाहेर फरफटत ओढून काढले आणि त्याच्या डोक्यात बंदुकीची गोळी घालून त्यास ठार मारले.
चंदन वंदन जवळ झालेल्या लढाईत हमीदुद्दीनखानाने धनाजी जाधवांचा मुलगा मारला होता.धनाजी जाधवांच्या मुलाच्या हत्येचा बदला संताजीने हिंमतखानाच्या हत्येने वसूल केला.मरताना हिंमतखानाने औरंगजेबाच्या बोकांडी १८ लाख रुपये कर्ज करून ठेवलेले होते.संताजी घोरपडेंच्या अतुलनीय पराक्रमापुढे औरंगजेब अक्षरशः थकून-वाकून गेला आणी त्याची दाढी आणी डोक्याचे उरले सुरले काळे केसही संताजीमुळे पांढरे झाले.

: https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0Z2TzKdgkkAgNZi3AhZz9hJqJUXPQ3kveHQSbmzzjt81g9LFKhcbj7t9Yiadczv7Ml&id=100011637976439&mibextid=Nif5oz 
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने