बाबासाहेबांची जयंती कधी आणि कोणी सुरू केली?

बाबासाहेबांची जयंती कधी आणि कोणी सुरू केली?


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज भारतात व संबंध देशात अतिशय उत्साहाने साजरी करण्यात येते. मात्र या जयंतीची सुरुवात पहिल्यांदा पुणे शहरात जर्नादन सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १ ९ २८ रोजी सुरू केली. महामानवाच्या जयंती दिनाच्या जनकाविषयी या लेखात माहिती देण्यात आली आहे.
जुन्या काळातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांच्या जन्म सासवड येथे २४ ऑगस्ट १८ ९ ८ मध्ये झाला. ज्या काळात शिक्षणाच्या सोयी वा सवलती उपलब्ध नव्हत्या त्या काळात पुणे जिल्ह्यातील दलित समाजातील ते पहिले मॅट्रिक्युलेट झाले यातच त्यांचा मोठेपणा आहे ! मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दोन वर्षे अभ्यास केला. १९१८ ते २१ साली त्यांनी सन्मार्ग दर्शक मंडळाची स्थापना करून सामाजिक सभा, संमेलने, मौलिक व्याख्याने, नाटके, प्रौढांकरिता रात्रीचे वर्ग चालवले. सोबतच व्यायामशाळा काढून तरुण सुशिक्षितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. महार सेवादलाची त्यांनी स्थापना केली. तिचे ते कमांडर इन चीफ बनले. राजकारण जास्त केले नाही, परंतु सामाजिक कार्याचे ते अर्ध्वयू होते. समाजकार्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र, तीन हजार रुपये प्रेस फंड, पाच हजार रुपये इमारत फंड जमवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पुण्यात युवक परिषद भरवली गेली ती पुणे जिल्ह्याकरिता किंवा शहरासाठी नव्हती. त्यात संबंध महाराष्ट्रातील प्रतिनिधी आले होते. १९३९ साली कायदे मंडळात चौदाही प्रतिनिधी निवडून गेले. त्याचे श्रेय भाऊसाहेब रणपिसे यांचेकडे ओघानेच जाते.
महात्मा गांधी यांनी पुण्यात उपवास केला त्यावेळी बाबासाहेबांचा मुक्काम नॅशनल हॉटेलमध्ये होता. त्या वेळी रणपिसे यांनी मोलाची कामगिरी बजावली. विशेष म्हणजे ते त्या वेळी सरकारी नोकरी करीत होते. अशा त-हेने ते एक प्रकारची समाजसेवा करीत होते. आपले शरीर सुदृढ ठेवले. आयुष्यात कोणतेही व्यसन केले नाही. जुन्या चालीरितीविरुद्ध रणपिसे यांनी मोठी चळवळ केली हे पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कार्याला नारायणगाव येथील परिषदेत पाठिंबा दिला होता यावरून त्यांच्या कार्याची कल्पना येते. बाबासाहेबांना रणपिसे यांनी जी मदत केली ती पुण्यात कोणीही केली नाही. राजकीय भूमिकेवरून ते बाबासाहेबांचे पुण्यातील उजवे हातच होते. दीर्घोद्योग, चिकाटी, निर्भयपणा, स्वीकारलेल्या कार्याची अखंड तळमळ, निस्वार्थीपणा, मधुर वाणी यामुळे त्यांनी सर्वांचीच मने आपल्याकडे खेचून घेतली होती.
पहिली जयंती 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला वाढदिवस पुण्यात प्रथमच १४ एप्रिल १९२८ रोजी रणपिसे यांनी साजरा केला इतकेच नव्हे तर या जन्मदिवस समारंभाचे ते जणू शिल्पकार ठरले. बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा त्यांनीच सुरू केली. खडकी पत्र विभाग दलित मंडळाचे अध्यक्ष असताना जयंतीचे औचित्य साधत त्यांनी बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून, उंटावरून प्रचंड मिरवणुका काढल्या होत्या. यानंतर खडकी भागात प्रत्येक वस्तीत आंबेडकरांची जयंती साजरी होऊ लागली. या सर्व वस्त्यांचे भाऊसाहेबांनी एकीकरण घडवून दलित मंडळाची स्थापना केली. या मंडळातर्फे आंबेडकरांची जयंती भव्य प्रमाणात साजरी केली.
जुन्या चालीरितीविरुद्ध चळवळ 
समाजातील अनीती व जुन्या चालीरितीविरुद्ध रणपिसे यांनी पुण्यात मोठी चळवळ उभारून सामाजिक व शैक्षणिक कार्य केले. ‘धम्मपद’ या बौद्ध ग्रंथात म्हंटले आहे की, ‘फुलांचा सुगंध वाऱ्याच्या उलट दिशेला जात नाही. परंतु थोर पुरुषांचा सुगंध वाऱ्याच्या उलट दिशेलाही जातो. ‘पुण्यात एक काळ असा होता की, रणपिसे यांच्याशिवाय पान हलले जात नव्हते एवढी त्यांची अफाट लोकप्रियता होती. प्रपंचाच्या, नोकरीचा भार पेलत त्यांनी मिळालेल्या वेळेचा उपयोग समाजसेवा करण्यात घालवला. १९१८ पासून त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले. तो काळ पाहता कोणतीही नवी सुधारणा घडवून आणणाऱ्या व्यक्तीला जनतेकडून त्या काळी कडवा विरोध होत होता. तरीही त्या विरोधाला न जुमानता त्यांनी आपले कार्य अव्याहतपणे केले होते.
२४ ऑगस्ट १९५८ रोजी रणपिसे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळीने पुणे शहरात त्यांचा भव्य सत्कार समारंभ घडवून आणला होता. त्यात ठ.रा. पाडळे, ए.एस. कांबळे, जे.एस. भाऊसाहेब रणपिसे, वि.रा. रणपिसे ( संपादक ‘बोधिसत्त्व’ ), रा.तु. कांबळे, डी.टी. कांबळे, के.डी. भोसले आदी मान्यवरांचा समावेश होता. भाऊसाहेबांनी विद्यार्थ्यासोबतच अस्पृश्यवर्गाची जी बहुमोल सेवा केली त्याबद्दल संपूर्ण आंबेडकरी समाज त्यांचा सदैव ऋणी राहील यात शंका नाही. त्यांचा आदर्श आजच्या तरुणवर्गाने आपल्या डोळ्यासमोर सतत ठेवला पाहिजे, अखंडपणे चाळीस वर्षे त्यांनी समाजकार्याला वाहून घेतले होते.
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने